स्वातंत्र्यदिनाचा नवा संदेश

संपादकीय    संपादकीय    2020-08-15 12:00:47   

यावेळेसचा स्वातंत्र्यदिन अनेक अर्थांनी अभूतपूर्व असा आहे. केवळ भारतच नव्हे तर अवघे जग आज करोनाविरूद्ध एक प्रकारे स्वातंत्र्याचा लढाच लढत आहेत. या लढाईने माणसाचे जगणे आरपार बदलून टाकले आहे आणि आपल्या आयुष्याचा, जीवनशैलीचा पुनर्विचार करावयासही आपल्याला भाग पाडले आहे. जगातील सर्वाधिक सुसज्ज आणि श्रीमंत आरोग्य व्यवस्थाही किती हतबल होऊ शकते याचा धडा तर करोनाकाळाने दिला आहेच, सृष्टीच्या कौतुकाआड दडलेल्या भयावह रहस्यांची झलकही जगाला दाखवली आहे. जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये या ना त्या प्रकारे प्रलयाची संकल्पना अस्तित्वात आहे. प्रलयाची कल्पना मनुष्यजातीच्या मनात जन्माला आली ती बहुधा अशा प्रकारच्या हतबल करणाऱ्या संकटांमुळेच. मानवजात पृथ्वीतलावरून नष्ट होण्याची भीती हेच या संकल्पनांचे मूळ आहे. जीवसृष्टीच्या दृष्टीने कदाचित करोडो वर्षे सुरू असलेल्या एका प्रक्रियेचा तो क्षुल्लकसा अंश असू शकेल, परंतु मानवजातीसाठी मात्र अथक परिश्रम, प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या प्रगत समाजाच्या इतिहासाची ती इतिश्री असेल. त्यामुळेच आजचा स्वातंत्र्यदिन एका अर्थाने जगात सर्वत्र सध्या सुरु असलेला स्वातंत्र्यलढाच अधोरेखित करतो. करोनावर विजय मिळवण्यासाठी रशियाची लस कामी येते, अमेरिकेची येते की देशी प्रयत्न यशस्वी ठरतात याला मर्यादित महत्व आहे, यश कोणालाही मिळाले तरी त्यातून अखिल मानवजातीचे आयुष्यमान वाढणार आहे आणि आजघडीला तेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे. अवघी अवनी करोनामुक्त होऊन ‘पुनश्च’ आयुष्य प्रवाही व्हावे आणि  जीवनाची ‘बहुविध’ता त्याला प्राप्त व्हावी अशाच शुभेच्छा आजच्या स्वातंत्र्यदिनी दिल्या पाहिजेत. करोनाच्या संकटावर मात करुन जग पुन्हा ‘होते तसे’ व्हावे यासाठीचे प्रयत्न आता बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत आहेत, परंतु तरीही जग आता ‘होते तसे’ राहणार नाही याची खूणगाठ आपल्याला बांधावी लागणार आहे. आपले सारे आग्रह, निग्रह, हट्ट आणि हेके आपण जर करोनाच्या भीतीपायी गुंडाळून ठेवू शकतो तर मग सामाजिक सौहार्दासाठी तेच करायची वेळ आल्यावर एकमेकांना दंडांच्या बेटकुळ्या दाखविण्याची स्पर्धा का सुरु होते, याचा विचार आपल्याला आता करावा लागणार आहे. आज स्वातंत्र्याचा दिवस साजरा करताना, या स्वातंत्र्यातही किती प्रकारचे पारतंत्र्य आपल्याला जखडून ठेवू शकते याचा अनुभव आपण गेले पाच महिने घेत आहोत,याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर दोन तासांचा प्रवास करुन त्याच्या अंत्यदर्शनाला जाणेही शक्य होत नाही तेंव्हा मनाची स्थिती काय होते. मित्र-आप्त रूग्णालयात असताना त्याची विचारपूस करण्यासाठी जाण्याचे स्वातंत्र्यही परिस्थितीमुळे हिरावले जाते, तेंव्हा कसे वाटते. खिशात पैसा असतानाही दुकानांची बंद दारे आणि निर्मनुष्य रस्ते आपल्यात कशी परवशतेची भावना निर्माण करते या सर्व गोष्टी आपल्याला स्वातंत्र्याची किंमत आणि स्वातंत्र्याचा अर्थ नव्याने सांगताना दिसत आहेत. जगरहाटी सुरु राहते, जगरहाटी सुरु राहणारही आहे, परंतु अवघ्या जगाला एखादा क्षुल्लकसा व्हायरस जेंव्हा वेठीला धरतो, जेरीस आणतो तेंव्हा आपण थोडे अंतर्मुख होऊन जगण्याचा विचार करणार आहोत की नाही? एखाद्या देशासाठी, समाजासाठी स्वातंत्र्य ही आत्मसन्मानाची बाब असते. आपल्या देशाचा, समाजाचा, लोकांचा विकास कसा करावा, आपल्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. परंतु इंटरनेटच्या काळात एखाद्या विशिष्ट भूप्रदेशावरील मालकीला आता मर्यादित अर्थ आणि महत्व उरले आहे आणि भविष्यात ते अधिकाधिक निरर्थक होत जाणार आहे. अमेरिकेतील एखादा ग्राहक पिझ्झाची मागणी नोंदवतो, तेंव्हा ती नोंदवून घेणारी व्यक्ती भारतात असते आणि ती मागणी प्रत्यक्ष पूर्ण करणारी यंत्रणा अमेरिकेत असते याचे आपल्याला आता नवल वाटत नाही. या आणि अशा अनेक तांत्रिक गोष्टी पूर्ण करण्यासाठीचे मनुष्यबळ यापुढे प्रत्यक्ष आपल्या देशात आणण्याऐवजी त्या त्या देशातच ‘राहू देऊन’ का वापरु नये असा विचार गेल्या पाच महिन्यांत बळावतो आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात अमेरिकेच्या सोयीसाठी भारतात घरीच राहून रात्रभर ‘ऑफिसात’ राहणारांची संख्या वाढू शकते. सर्वच देशांचे हितसंबंध आज एकमेकांत गुंतलेले आहेत. जगाच्या एका टोकाला कुठेतरी जन्माला आलेला करोनाचा व्हायरस अवघ्या काही महिन्यांत मानवी शरीरांसोबतच प्रवास करत जगाच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात पोचतो यावरुनच आपल्याला दळणवळण, वावर आणि संबंध कसे खोलवर पसरलेले आहे याची कल्पना येते. दोन देशांमधील युद्धे आता आर्थिक आघाड्यांवर लढली जाणार आहेत आणि इंटरनेट हे त्याचे प्रमुख हत्यार असेल. केवळ आर्थिकच नव्हे तर वैचारिक, सांस्कृतिक लढेही आता इंटरनेटच्याच माध्यमातून लढले जात आहेत. करोडो रूपये खर्च करुन तयार करण्यात आलेली एखादी अमेरिकन वेबसिरिज आणि काही लाखांत तयार करावी लागलेली मराठी वेबसिरिज यांच्यातील स्पर्धा ही ‘समान पातळीवरील नाही’अशी तक्रार योग्य असली तरी ती करता येणार नाही, कारण ज्या ग्राहकाच्या हाती मोबाइल असेल त्याला तुमची आर्थिक कुवत काय आहे याच्याशी काही कर्तव्य नसेल. अशा परिस्थितीत आत्मनिर्भर वगैरे शब्दांना केवळ भावनिक अर्थ राहणार आहे, व्यावहारिक नव्हे. या स्थितीत आपण स्वातंत्र्यानंतरच्या पाउणशे वर्षांच्या प्रवासाचा नेहमीप्रमाणे आढावा घेण्याला काही अर्थ आहे का? तर तो निश्चितच आहे, परंतु तसे करताना देश, समाज, धर्म, अस्मिता यांच्या तलवारी उपसून आता प्रगती होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. इतिहासांत कोणी काय चुका केल्या याची सतत उजळणी करुन चालणार नाही याचे भान ठेवले पाहिजे. कारण आपले स्वतंत्र अस्तित्व असले तरीही आता त्याची नाळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवघ्या जगाशी जोडली गेलेली आहे. ‘अवघा रंग एक झाला’ ही केवळ भक्तीची भावना नसून ती सामाजिक गरज आहे हे आपण मनापासून स्वीकारले पाहिजे. स्वातंत्र्याच्या संकुचित अर्थाला तिलांजली देत आपण या संकल्पनेचा जेवढा विस्तार करु ते तेवढे अधिक अर्थपूर्ण होत जाणार आहे. व्यवहाराने जग एक होत असताना आपण भावनांनी एकमेकांशी घट्ट बांधून राहणे हाच देश, समाज, स्वातंत्र्य याचा नवा अर्थ आहे. सर्व लोकव्यवहार नव्याने सुरळीत होतील तेंव्हा अनेकांना नवी दृष्टी, नवे भान आलेले असेल. पुढील चार-पाच वर्षात अपेक्षित असलेली डिजिटल क्रांती अचानक आलेल्या संकटामुळे गेल्या चार महिन्यांतच आली आहे. अमेरिकेत असलेल्या आपल्या नातवाला आजोबाही म्हणतात, अरे जरा ‘झूम’ वर ये ना. मग याच क्रांतीचा हात धरून आपणही उत्तम साहित्याला ‘झूम’ करुन डिजिटल करु पाहतो आहोत, तेंव्हा बहुविधवरील लेख वाचताना कागदाच्या सवयीची होणारी अडचण, मानसिकता आता संपायला हरकत नाही. आपल्यासाठी आजच्या स्वातंत्र्यदिनाचा हा डिजिटल संदेश आहे, असे म्हणूया हवे तर!

संपादकीय

प्रतिक्रिया

  1. Anagha Sunil Modak

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख मिळाला आपल्या परिवारात सहभागी होत आहोत . पुनःश्र्च ला शुभेच्छा

  2. atmaram-jagdale

      4 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर लेख . भविष्याचा अचूक वेध घेताय .

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    फारच छान लेख आहे.नव्या यंत्र युग व डिजीटल युगात नक्की बदल होत आहे. या बदलाला सामोरे जावेच लागेल.

  4. bgb

      4 वर्षांपूर्वी

    आजच्या अग्रलेखात कोरोनाच्या पार्श्वभुमिवर निर्माण झालेल्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन आहे त्याबरोबर भविष्य कालीन शक्यताही सुस्पष्टपणे नमूद केल्या आहेत. धन्यवाद.

  5. kaustubhtamhankar

      4 वर्षांपूर्वी

    कोरोना ने सर्व जग हे एकच आहे हे समस्त मानव जातीला दाखवून दिले आहे . पण हे सर्वांना कळणे या जन्मीतरी कळणे अशक्य आहे! आपण म्हणतो ही अमेरिकेची , ती रशियाची, तर ही भारताची लस ! ही कोरोना वरील लस सर्व जगासाठी आम्ही तयार केली आहे असं खरतर प्रत्येक देशाने म्हणायला हवे. लसीत सुद्धा स्पर्धा आणि व्यापार आणि गुप्तता आपण राखणार असू तर अस्ताला जाणारा कोरोना त्याचे किरिट काटे विचकवून आपल्याला हसेल.

  6. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख छान लेख

  7.   4 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर

  8. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख

  9. arundate

      4 वर्षांपूर्वी

    कोरोनामुळे सर्व जग जमिनीवर आले.मानवाचा अहंकार/मीपणा कमी होणे भाग पाडले.

  10. Prakash Hirlekar

      4 वर्षांपूर्वी

    छान.भावना नेमक्या अभिव्यक्त.

  11. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    सकारात्मक विचार दर्शवणारा लेख, धन्यवाद

  12. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम जमून आलाय लेख ---- कोरोना काळाने नात्यांचं महत्व नव्याने उलगडतांना आणि त्यांची जोपासना करायला कोणत्याही आर्थिक निकषांशिवाय शिकवले आहे. जसजसा अजून काळ सरेल तसतसं गर्दीच जमवून कार्यक्रम पार पडले जावू शकतात हा गैरसमज दूर होऊन खर्चात बचत होईल. वेगवेगळ्या विचारप्रवाहांनी यापुढील सायबर लढाया होत राहतील. मानव वंश अवनीवर टिकला पाहिजे ही संपादकांची तळमळ मात्र मीहि समजू शकतो. चांगला आणि विचारप्रवर्तक लेख. अभिनंदन आणि शुभेच्छा -----

  13.   4 वर्षांपूर्वी

    खरे स्वातंत्र्य आपण तेव्हाच भोगू शकू जेव्हा होऊन गेलेल्या महापुरुषांच्या जोखडातून मुक्त होऊ.परमात्मा निर्गुण खरा त्याच्या मुर्त्या मंदिर यांंचा अतिरेक थांबेल.omg मधे हेच सांगितले आहे. जे जे भेटे भूत।ते ते मानिजे भगवंत। असे व्हायला हवे. आपण एकातून सूटून दुसऱ्या बंधनात अडकणे हे स्वातंत्र्य नव्हे.

  14. Sonali deshpande

      4 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे एक वायरस ने संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे

  15.   4 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे एक वायरस ने संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे

  16. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    करोनाने संपूर्ण जग ढवळून काढले तेही चांगलेच म्हणायचे. त्याने अस्मानगवसणी घालू पहाणार्या मानवास आपला तळ आठवला.

  17. rsrajurkar

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख . धन्यवाद .

  18. Namrata kadu

      4 वर्षांपूर्वी

    लेख मनापासून आवडला...सध्या अनुभवत असलेल्या स्वातंत्र्यातील पारतंत्र्याची जाणिव आणि नव्या बहुविध जगाचे नाविन्यपूर्ण आयाम सुरेख शब्दांत मांडले आहेत. मनःपूर्वक धन्यवाद...

  19. रविकिरण कुलकर्णी

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख! स्वातंत्र्याचा खरा अर्थ नेमका उलगडून दाखवलाय.

  20. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    जय हिंद लेख छान आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen