टाहो

पुनश्च    सई परांजपे    2019-07-19 19:00:41   

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं.. ‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला. गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबा करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लोकसत्ता , अवांतर , सई परांजपे , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. purnanand

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख दिल्याबद्दल धन्यवाद. १९९१ पासून उनेस्को ने जगातील भाषा मरतअसल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. २०११ च्या भाषिक जनगणने नुसार फक्त १८०० भाषा शिल्लक असल्याचा निष्कर्ष निघाला.व आणखी शोध घेतला असता जवळजवळ ३००० भाषा काळाच्या पडद्याआड गेल्याचे लक्षात आले. जनगणनेच्या वेळी जी भाषांची नोंद झाली तेव्हा फक्त १०९ भाषा निघाल्या.सर्वत्र भाषांची अशीच मुस्कटदाबी करण्यात आली आहे.जग व माणूस यांना जोडणारा एकमेव सेतू केवळ भाषेचाच असतो. भटक्या व विमुक्त जाती समुदायांच्या भाषेमध्ये चंद्र,सूर्य तारे,दिशा पृथ्वी यांची माहिती ,ओळख सांगणारे कितीतरी शब्व आहेत.त्या भाषांना तर कोणी वालीच नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शुद्ध मराठी साठी खास प्रयत्न होणे गरजेचे वाटते.

  2. ह वि कुंभोजकर

      5 वर्षांपूर्वी

    मराठी भाषेचे मरण अटळ आहे हरिहर कुंभोजकर मराठींचेच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांचे मरण अटळ आहे. ही क्रिया अठराशे अठ्ठावन्न सालापासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर तिने वेग घेतला. पण पन्नास-पंचाहत्तर वर्षांनी या भाषा जिवंत राहण्याची शक्यता नाही. भारतीय भाषा, कदाचित, बोलीभाषा म्हणून आणखी काही काळ जिवंत राहतीलही. पण प्रगत भाषा म्हणून त्या जिवंत राहण्याची काहीही शक्यता नाही. भाषेचा अंत हा संस्कृतीचा अंत असतो. प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न लोकांच्याच संस्कृतीची भरभराट होते. आणि प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न होण्यासाठीच आपण आपल्या भाषेचा त्याग करून इंग्रजीचा अंगिकार करत आहोत. आपण मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी, निदान जिवंत ठेवण्यासाठी जी काही धडपड करत आहोत त्याचे वर्णन एकाच इंग्रजी वाक्यात करता येते: It is too late and too little. जुन्या लोकांना, कदाचित, आठवत असेल की, ज्यावेळी मुंबई-राज्य त्रैभाषिक होते, संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता, त्यावेळी मराठी शिकणे अकरावीपर्यंत सक्तीचे होते, आणि इंग्रजी ऐच्छिक होती; तीही इयत्ता आठवीपासून शिकवली जात असे. मराठी लोकांची अस्मिता जपणारा संयुक्त महाराष्ट्र झाला आणि इंग्रजीचे महत्त्व वाढले. हे अजाणता झालेले नाही ! राज्य-पातळीवर बहुजन समाजाची मुले आणि अखिल भारतीय पातळीवर मराठी मुले स्पर्धेत मागे पडू नयेत म्हणून हा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला. हा निर्णय निखालस अशैक्षणिक होता. कोणत्याही प्रगत देशात परकीय भाषेतून शिक्षण दिले जात नाही. पण आम्हाला अर्थार्जन हे ज्ञानार्जानापेक्षा महत्त्वाचे होते. ज्या भाषेने लोकांचा आर्थिक विकास होतो, जी भाषा लोकांना समृद्ध करते तीच भाषा लोक समृद्ध करतात. त्यामुळे, मराठी भाषेतील प्राविण्य, नेमाडेंचेच शब्द वापरायचे म्हटले तर, आमच्यासाठी एक समृद्ध अडगळ ठरली. वस्तुत: व्हिक्टोरिया राणीने ‘कैसर-इ-हिंद’ झाल्याची द्वाही फिरवली त्यातच सर्व भारतीय भाषांच्या मृत्यु-दंडाचीही घोषणा अध्याह्रत होती. अर्थात, हा ‘स्लो पॉइझनिंग’ने मृत्यू होणार होता, त्यामुळे ती गोष्ट ठळकपणे जाणवण्यासारखी नव्हती. पण इतिहासाचार्य राजवाडे यांच्यारख्यांच्या ते ध्यानात आले होते. ब्रिटिशांचे राज्य भारतात येणे ही एक सर्वंकष क्रांती होती. या क्रांतीनंतर आपल्याला वैय्यक्तिक विकासासाठी भारतीय भाषांतील प्रावीण्याची गरज नव्हती. आणि ज्याची गरज नसते, ते प्रयत्नपूर्वक टिकवले तर टिकते. पण काही काळच. कारण काही काळानंतर प्रयत्न निसर्गतःच अपुरे पडत जातात. इंग्रज येण्यापूर्वी हा देश एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हता. कारण, सांस्कृतिक दृष्ट्या आम्ही बरेचसे एक असलो तरी राजकीय दृष्ट्या एक नव्हतो. इंग्रजांनी आम्हाला एकाच दावणीला बांधले आणि भारताची राष्ट्र होण्याची प्रक्रिया सुरु झाली. (अर्थात, युरोपातही राष्ट्र-निर्मितीची प्रक्रिया याच सुमारास सुरु होत होती.) इंग्रज किंवा त्यांच्यासारखे अन्य कोणी भारतात आले नसते तर आम्ही एकमेकाशी लढाई-झगडे करत बसलो असतो. त्यातून शेवटी युरोपप्रमाणे भारतातही अनेक राष्ट्रे निर्माण झाली असती, पण भारतीय भाषा टिकल्या असत्या. आम्ही जर शहाणपणाने वागलो असतो तर त्यातून आजच्या युरोपियन युनियनसारखा राष्ट्र-संघ, कदाचित, निर्माण झालाही असता. (आजचा युरोपीय राष्ट्र-संघही दोन महायुद्धात कोटी-कोटी लोक मारूनच शहाणपण शिकला.) आम्ही शहाणपणाने वागलो नसतो तर आमची स्थिती आजच्या मुस्लिम देशांच्यासारखी किंवा आफ्रिकन देशासारखी झाली असती. पण इंग्रज आले आणि आमच्यात राष्ट्रीय एकतेची भावना रुजण्यास सुरवात झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आलेले नवे राज्यकर्ते भारतीय भाषांना राणी व्हिक्टोरियाने ठोठावलेली शिक्षा रद्द करू शकले असते. पण त्यांच्या पुढे प्रश्न होता देश वाचवायचा की भारतीय भाषा ! आणि त्यांनी देश वाचवायचा निर्णय घेतला. मागे वळून पाहता, भाषांवर आधारलेल्या राष्ट्रांचे संघराज्य करून भारतीय भाषा आणि भारत दोन्ही वाचवणे अशक्य नव्हते. आजही ते अगदीच अशक्य आहे असे म्हणता येणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एका भाषेतले ज्ञान दुसऱ्याभाषेत सुलभतेने उपलब्ध करून देणे शक्य आहे. पण कठीण निर्णय घेण्याची आणि त्यासाठी किंमत मोजण्याची आमची परंपरा नाही. भारतीय भाषा वाचवण्याचा एकमेव उपाय त्यांचा शिक्षणासह सर्व क्षेत्रात वापर करणे मातृभाषा हीच ज्ञानभाषा आणि अर्थार्जनाची भाषा होणे आणि इंग्रजीचे स्थान आज चीन, जपान, जर्मनी, रशिया, इ. देशांत आहे तसे पूरक ठेवणे हाच आहे. पण असे आपल्या देशात होण्याची दूरान्वयानेही शक्यता नाही. संस्कृत ही ज्ञानभाषा करून आपण आपले नुकसान करून घेतले. इंग्रजी ज्ञानभाषा करून आपण काही प्रमाणात तेच करत आहोत. तेंव्हा देशाच्या मानसिकतेचा विचार करता सर्व भारतीय भाषांना यथावकाश मरू देणे एव्हढेच उरते. आजूबाजूला डोळसपणे पाहिले तर ही प्रक्रिया सुरु झाल्याचे जाणवेल ! ________________________________ डॉ. ह. वि. कुंभोजकर ४०३, पूर्वरंग अपार्टमेन्ट, राजारामपुरी १३ वी गल्ली, कोल्हापूर , ४१६ ००८ दूरध्वनी (0231) 2525006, चलभाष 9834336547 e-mail: [email protected]



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen