शैक्षणिक धोरणे आणि विषयांचे पर्याय


उच्च माध्यमिक शिक्षणात सध्या ज्या विषयांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि शिक्षण संस्था विषयांचे किंवा विषयांच्या गटांचे जे पर्याय प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना देऊ करतायत, त्यातील भेदाची चिकित्सा करणारा शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा हा स्फुट लेख -

उच्च माध्यमिक वर्गांमध्ये म्हणजे इयत्ता अकरावी व बारावी या वर्गांसाठी सहा विषय घेण्याच्‍या अटी पुढीलप्रमाणे आहेत :
(१) इंग्रजी (अनिवार्य)
(२) मराठी/हिंद/गुजराती/..../.... भारतीय भाषांतून एक
(३) अनेक विषयांतून कोणतेही चार विषय. या चार विषयांत (२) मध्ये न घेतलेली भाषा किंवा परदेशी भाषाही येतात.
वास्‍तविक महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विस्‍तृत पर्याय दिले होते व कला/वाणिज्‍य/विज्ञान अशा ज्ञानशाखा वेगळया मानल्‍या नव्‍हत्‍या. पण, बहुतेक सर्व शिक्षणसंस्‍थांनी उच्च माध्यमिक स्‍तरावर दोन किंवा तीन भाषा आणि चार किंवा पाच/सहा एवढेच विषय पर्यायी म्‍हणून ठेवले. काही संस्थांनी दोन ठरावीक भाषा व चारच विषय अनिवार्य करून प्रशाळा-कनिष्ठ महाविद्यालयाचे वेळापत्रक ‘डबाबंद’ करून टाकले. एवढेच नव्‍हे, तर उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे कला/वाणिज्‍य/विज्ञान अशा शाखानिहाय पर्यायी विषयांची यादी देण्याचा आग्रह केला!
त्‍यामुळे नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वाणिज्‍य व विज्ञान शाखांमध्ये पुढीलप्रमाणे विषयांची वाटणी केली.
वाणिज्‍य शाखा : अर्थशास्‍त्र‚ वाणिज्‍य‚ लेखापरीक्षण सचिवांची कार्यपद्धती (बूक किपिंग अँड अकाऊंट‚ गणित‚ मानसशास्‍त्र‚ भूगोल.
विज्ञान शाखा : भौतिकशास्‍त्र‚ रसायनशास्‍त्र‚ गणित‚ जीवशास्‍त्र‚ भूगर्भशास्‍त्र‚ भूगोल‚ मानसशास्‍त्र‚ अर्थशास्‍त्र व संस्कृत
कलाशाखेत तर दोन भाषा अधिक चार कोणतेही विषय (विज्ञान व वाणिज्‍य शाखेतीलही) असा विस्‍तृत पर्याय ठेवला आहे. हे बऱ्याच मंडळींना काय, तर प्राचार्यांनाही माहीत नाही. माझ्या एका विद्यार्थिनीने इंग्रजी (भाषा)‚ मराठी‚संस्कृत‚ रशियन (भाषा),अर्थशास्‍त्र व भूगोल असे विषय घेतले होते. विज्ञान शाखेतील हजारो विद्यार्थी जीवशास्‍त्र किंवा गणित विषय सोडून भूगोल हा चौथा विषय घेतात. तर वाणिज्‍य शाखेत गणित हा विषय अनिवार्य करणारी काही कनिष्ठ महाविद्यालये मुंबईत अनेक आहेत. संगीत/कला इत्‍यादी विषयही चार पर्यायी विषयांमध्ये घेता येतात. तर विज्ञानात माध्यमिक स्‍तरापासून तंत्रज्ञानाची तोंडओळख (आय. बी. टी.) हा नव्‍यानेच सुरू झालेला विषयदेखील  लोकप्रिय होत चालला आहे. (उदा. पाबळ विज्ञानाश्रम‚ चिखलगावची लो. टिळक शाळा इ.)

हेही वाचा :
नवनवीन शैक्षणिक धोरणे आणि आकृतिबंध 
त्रिभाषा सूत्र : समज आणि गैरसमज

याचा अर्थ, नवीन शिक्षण पद्धतीत कला-शास्‍त्र-वाणिज्‍य असे कप्‍पे नसणार आणि विद्यार्थ्यांच्‍या आवडीप्रमाणे कोणतेही विषय निवडता येतील, असे जे सांगितले जाते, त्‍यात फार नावीन्‍य नाही! कारण, सध्या अस्‍तित्‍वात असलेल्‍या पद्धतीत तसा भरपूर वाव आहे. फक्‍त अशा प्रकारच्‍या योग्‍य व चांगल्‍या शिफारशींची वाट लावणाऱ्या अनेक शिक्षण संस्‍था चारच विषय अनिवार्य करून नुकसान करण्याचे कार्य सुरळीत चालूच ठेवतील व पूर्वीप्रमाणेच हे पर्याय-स्‍वातंत्र्य नष्ट करतील, यात शंका असू नये! असं होऊ नये यासाठी कोणती योजना नवीन शिक्षण धोरणात अंतर्भूत केली आहे, ते कळले तर बरे होईल !

- विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , उच्च माध्यमिक शिक्षण , अकरावी , बारावी , विषयांचे पर्याय , कनिष्ठ महाविद्यालय , विद्याधर अमृते , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen