आणीबाणी विशेषांक आणि 'प्रतिक्रियावादी' वाचक!

आणीबाणी    संकलन    2018-07-02 22:00:37   

पुनश्चने विशेषांकासाठी आणीबाणीचा विषय निवडला आणि योगायोगानं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो भाजपनंही राजकीय अजेंड्यावर आणला. 'पुनश्च'ने आपल्या प्रकृतीनुसार कुठलीही बाजू न घेता आणीबाणीचे सर्व पैलू मांडणारे दहा लेख महिनाभरात दिले आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद उत्तम म्हणण्याचे कारण असे की लेख केवळ वाचले गेले नाहीत तर त्यावर भरभरून प्रतिक्रियाही दिल्या गेल्या. या  प्रतिक्रिया इतरांनाही वाचता याव्यात आणि ज्यांचे लेख वाचायचे राहिले असतील त्यांना त्या वाचून पुनश्चमधील लेखांकडे वळावेसे वाटावे म्हणून त्या सोशल मीडियावर टाकत आहोत.

प्रतिक्रिया लिहिणाऱ्या पुनश्चकरांना मनापासून धन्यवाद-

१) तुरुंगातले दिवस

बुकवर्म -- मृणाल ताईंमधल्या खंबीर परंतु कोमल माणुसकीचे मनोज्ञ दर्शन या लेखात घडते. आजच्या पिढीसाठी त्या एक आदर्श कार्यकर्ता म्हणून अनुकरणीय आहेत.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संतुलित राहायचे याचा वस्तुपाठ आहे हा लेख. छान! मीनल ओगले-- खूप छान माहितीपू्र्ण लेख.माणुसकी आणि धडाडी यांचा मनोज्ञ संगम शांडिल्य -- छान वाटलं

२) साहित्यिकांची वामकुक्षी निर्वेध चालू आहे!

महेश बापट -- परखड!  मकरंद जोशी -- अत्यंत परखड,मराठी साहित्य जगताची क्ष किरण तपासणी शुभदा बोडस -- सर्वंकष आढावा घेतला आहे

३) ऐन आणीबाणीत, साहित्य संमेलनाच्या मंचावरून

महेश बापट -- थोडा समजला. बराचसा डोक्यावरून गेला. राजन आळवे -- बरे वाटले वाचून, गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यमय पुस्तक हातात असणे हे भुषण होते, पण आज त्यांनाहि पैस्यासाठी आहवान करावे लागले ,हेच दुर्देव आहे. प्रकाश जोशी – अचंबित व्हायला झालं वर्षा गोखले -- आठ दहा ओळी वाचून दम लागला, अवघड आहे!

४) जनांचा प्रवाहो चालिला

वसंत देशपांडे -- फार छान लेख आहे . विजयाच्या क्षणी जबाबदारीची जाणीव होणं हे विचारी मनाचं लक्षण आहे. त्याबद्दल हर्डीकरांचं करावं तेवढं कौतुक थोडेच ठरेल. पण त्याच बरोबर इंदिरागांधींचा पराभव झाला ही बातमी कळली , त्या क्षणाचा विलक्षण आनंद ज्या ज्या वेळी तो विषय निघतो त्या त्या वेळी आठवल्या शिवाय राहत नाही, हेही सत्य विसरता येत नाही. मी प्रवासात होतो, इंदूरला आमची ट्रेन थांबली होती आणि ध्वनिवर्धकावरून बातमी आली तेव्हा एकच जल्लोष झाला. शेजारी उभ्या असलेल्या माणसाने एकदम मिठी मारली. ना आम्ही ओळखीचे ना देखीचे, पण आम्ही जे मानसिक क्लेश सोसले होते ते सारे क्षणात दूर झाले अशी जणू त्यावेळी सुखद जाणीव झाली. पुढे काही दिवसांनी जयवंत दळवी यांनी लिहिलेली जयप्रकाजींची आठवण वाचली आणि उलगडा झाला. त्यांना भेटायला दळवी गेले होते तेव्हा ते काय बोलताहेत हे ऐकण्याकरिता दळवींना आपले कान त्यांच्या तोंडाशी न्यावे लागले,इतके जे.पी. अशक्त झाले होते, नव्हे केले गेले होते. ते म्हणाले, “प्रत्येकाच्या कानात सांग आणीबाणी वाईट आहे, म्हणजे ती उठवावी लागेल .” दळवीनी पुढे लिहिले होते, मला वाटले म्हातारबुवांना भ्रम झालाय. पण नंतर गावात गेलो, तेव्हा बांधाबांधावर खेडूत एकमेकांना तेच सांगत होते.तेव्हा कळले की जनमानसाने जेपींसारख्या तपस्व्याचे ऐकले होते. ही सार्वजनिक भावनााच मला मिठी मारणाा-या अनोख्या प्रवाशाने माझ्यापर्यंत पोहोचविली होती. आज हा लेख देऊन तुम्ही पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून दिलात. धन्यवाद. मीनल ओगले -- एक उत्तम आणि समयोचित लेख.जनता पक्षाचे पुढे काय झाले ते सर्वज्ञात आहे.एका चळवळीच्या झालेल्या अंताबद्दल वाटलेले हळहळ लेखकाच्या समतोल विचारसरणीची साक्ष देते.वाचनीय लेख. अस्मिता गाडगीळ -- विचार करायला लावणारा लेख आहे. मुकुंद जी -- पण पुन्हा काॅग्रेस निवडून आली. कांद्याचे भाव वाढले म्हणून परत इंदिरा गांधीना निवडून दिले. ही सामान्य जनतेची अक्कल. मग कधी कधी हिटलर म्हणत होता तेच खरे वाटते. ” सामान्य जनतेच्या हातात राज्यकर्ता निवडून देण्याची शक्ती देणे हा मूर्खपणा आहे. त्यानंतर आतापर्यत अतोनात भ्रष्टाचार झाला पण जातीपातीत अडकलेली जनता जातवाल्याना मते देत राहिली. प्राची दामले -- सुंदर लेख वृषाली उगले -- उत्तम माहितीपर लेख विनायक बापट -- BEST OF ONE. शुभदा बोडस -- जुन्या आठवणी जाग्या झाल्या, पण ह्यातून आपण काहीच शिकलो नाही हेही लक्षांत आलं.

५) अशीच जावी काही वर्षे आणि सावट यावे पुढचे

सुबोध केंभावी -- >>अमक्या सामाजिक परिस्थितीवर लिहा असं समीक्षकानं म्हणू नये, त्या परिस्थितीचा संदर्भ तुमच्या लिखाणात अजिबात सुटला आहे एवढंच त्यानं दाखवून द्यावं<< असं हर्डीकरांनी ह्या लेखात लिहिलय. प्रत्यक्षात मात्र मान्यवर समीक्षक लोक केवळ संदर्भाची उणीव दाखवून थांबत नसतात. अमुक आशय, संदर्भ लेखनात असला पाहिजे ह्यासाठी लेखकावर हुशारीने दबाव आणला जात असतो. मान्यवर समीक्षकांना अपेक्षित असलेला संदर्भ लेखनात नसेल तर त्या लेखकाची दखल घेणं बंद होतं. सामाजिक परिस्थितीची जाणीव अशा साध्या वर्णनामागे एका राजकीय विचारसरणीला बांधून घ्या असा छुपा आग्रह असतो. लेखकाच्या सृजनशीलतेला असेलला हा धोका हर्डीकरांना ७८ साली नीट समजला नसेल पण २१ व्या शतकातील वाचकांनी ह्याबाबत सजग राहायची गरज आहे.

६) आणीबाणी कधी लादतात आणि भारतीय आणीबाणीचे परिणाम

वसंत देशपांडे -- छोटापण माहितीपूर्ण लेख आवडला. शुभदा बापट -- १९७५ ला आणिबाणी काय हे कळत नव्हते. फक्त काहीतरी भितीचे वातावरण होते. आता पुन्हा गतकाळ आठवला. ठळकपणे आठवते ते किशोरकुमारची गाणी रेडिओवर लावायला बंदी होती.

७) अनुशासन पर्व नव्हे, ते आंतक-पर्व आहे. निर्दय दमन-पर्व आहे.

केदार जोशी -- Too good

आदित्य बापट -- विनोबा भावे आणि ‘अनुशासन पर्व’ : सत्य आणि विपर्यास -  दिनांक २५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली. तत्पूर्वी सहा महिने आधीच, म्हणजे २५ जानेवारी १९७५ पासून विनोबांनी “तुका म्हणे वाचा वाहिली अनंता | बोलायचे आता काम नाही” || म्हणत ‘मौन’ स्वीकारलं होतं. तेंव्हापासून त्यांचा सर्व संवाद फक्त लेखी स्वरूपात आणि तोही अगदी मोजक्या – थोडक्या शब्दांत होत होता. अशात आणीबाणीच्या घोषणेनंतर अकरा दिवसांनीच – म्हणजे दिनांक ६ जुलै १९७५ या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास अनपेक्षितपणे कॉंग्रेसनेते वसंतराव साठे त्यांची कन्या सुनीतीसह विनोबांना भेटायला पवनार आश्रमात आले. ‘विनोबा कुटी’त प्रवेश केल्यावर खुणेनेच विनोबांनी “कसं येणं केलंत?’ असा प्रश्न साठेंना केला. “ह्या नव्या पर्वानंतर मुद्दाम आपल्याला भेटायला आलो आहे” असं साठे यांनी एका कागदावर लिहून विनोबांकडे तो कागद सोपवला. त्यांच्या वाक्यातील “ह्या नव्या पर्वानंतर” शब्दांना अधोरेखित करून विनोबांनी त्यापुढे “अनुशासन पर्व ?” (प्रश्नचिन्ह महत्त्वाचं) असे प्रश्नार्थक उद्गार लिहिले. त्या दिवसांत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भाषणात ‘अनुशासन’ शब्द वारंवार येत असे. इंग्रजी वृत्तपत्रांमाध्येही ‘डिसिप्लीन’ शब्द असायचाच. तोच धागा पकडून साठे यांच्या “ह्या नव्या पर्वानंतर” या शब्दांना प्रश्न म्हणून “कोणते नवे पर्व?… अनुशासन पर्व?” असा सहज संवाद विनोबा, भेटायला आलेल्या साठेंबरोबर करू इच्छित होते हे लक्षात येतं. ‘अनुशासन पर्व’ च्या पुढे पूर्णविराम नव्हता, तर प्रश्नचिन्ह होतं. कोणालाही सहज प्रश्न पडेल कि ‘अनुशासन पर्व’ पुढे प्रश्नचिन्ह का ? जर विनोबांनी तिथे प्रश्नचिन्ह वापरलंच नसतं तर असं वाटणं अगदी स्वाभाविक होतं कि ते आणीबाणीला जणू एक प्रतिशब्दच वापरत आहेत. आणीबाणीचं अप्रत्यक्ष समर्थन करत आहेत. पण विनोबांना तसं काही सुचवायचं नव्हतं. त्याच म्हणजे ६ जुलैच्या रात्री रेडीओ वरच्या बातम्यांत वसंतराव साठ्यांचं विधान प्रसारित करण्यात आलं, ज्याचा आशय असा होता कि, विनोबांनी आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं आहे. झालं; एका रात्रीत देशभर खळबळ माजली. समाजवादी आणि सर्वोदयी कार्यकर्त्यांकडून तर तीव्र प्रतिक्रिया आल्या. विनोबांविषयी गैरसमज वाढत गेले, त्यांच्यावर तीव्र टिका आणि दोषारोप होऊ लागले. त्यांची प्रचंड निंदा करण्यात येऊ लागली… आता याला काय म्हणावं?, विनोबांना विचारायचा होता प्रश्न आणि बातम्यांतून सांगण्यात आलं होतं कि त्यांनी आणीबाणीचं वर्णनच जणू ‘अनुशासन पर्व’ अशा शब्दांत करून एक प्रकारे आणीबाणीचं समर्थन केलंय. स्वतः विनोबा आणि त्यांचे आश्रमातील सहकारी या सर्व घटनेचे नुसते मूकदर्शक झाले. विनोबांनी सहकाऱ्यांना सूचना केली, “इसे कोल्ड स्टोरेज में रखो” अर्थात कोणीही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नये. त्यामुळे त्या सुचनेचं होईल तेव्हढं पालन करण्याचं बंधन सर्वांवरच होतं. पुढे काहीच दिवसांत; दिनांक १८ जुलैला कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते, पक्षाचे माजी कोषाध्यक्ष नि गुजरात राज्याचे माजी राज्यपाल श्रीमन्नारायणजी विनोबांना भेटायला पवनार आश्रमात आले. वसंतराव साठे नि विनोबा यांच्यातल्या लेखी संवादाचा तपशील त्यांनी आश्रमातल्या साधकांकडून जाणून घेतला आणि विनोबा अजूनही मौनातच असल्याने केवळ तीन प्रश्न एका कागदावर लिहून ते विनोबांपुढे ठेवले. पहिला प्रश्न होता, “साठे यांनी तुमच्या बरोबरचा संवाद माध्यमांत प्रकाशित करण्याची अनुमती तुमच्याकडून घेतली होती का ?” विनोबांनी “मौनं” असं लिहून पुढे नकार दर्शवणारी ‘X’ काढली. त्यांचा दुसरा प्रश्न होता, “जे घडलं त्याचं रेडीओ वरील वार्तांकन योग्य होतं का ?” यावरही विनोबा ‘X’ अर्थात नाही असं उत्तरले. आणि तिसरा प्रश्न, “वार्तांकन जर अयोग्य होतं तर त्याचं खंडन करावं का ?” त्यावरही विनोबा ‘X’ इतकंच लिहिते झाले. या सर्व घटना आणि संवादांमधून विनोबांच्या भूमिकेविषयी पुरेशी स्पष्टता येते. आजही विनोबा म्हंटलं कि अनेकांना त्या घटनेचा कोणताही आगा पिछा माहित नसताना केवळ त्यांचे ‘अनुशासन पर्व’ हे कथित (खरंतर अकथित !) उद्गारच आठवतात आणि अज्ञानातून आजही टिका टिपणी चालू राहते. मग सहजच विनोबांचीचं त्यांच्या एका पुस्तकातली वाक्य आठवतात, “माझ्यावर जर कुणी जास्तीत जास्त उपकार केले असतील तर ते म्हणजे माझ्या निंदकांनी, माझे दोष वारंवार सांगणाऱ्यांनी. म्हणून मी एक नियम ठरवून टाकला आहे कि कोणी माझ्यावर व्यक्तिगत टिका वा निंदा करत असेल तर मी त्याला कधीही उत्तर देणार नाही. कारण मला यातंच त्यांच्या (म्हणजे टिकाकारांच्या) माझ्यावरील उपकाराची जाणीव होते. त्यांचं असंही एक विधान आहे कि, अहिंसे मध्ये एक्सप्लोईटेशन (स्वार्थ साधून घ्यायला) पुष्कळ संधी असते आणि एक्सप्लोईटेशन करणं हा तर राजकारण्यांचा धंदाच आहे. संदर्भ : १) ‘विनोबा : अंतिम पर्व’ – कुसुम देशपांडे, परंधाम प्रकाशन, पवनार आश्रम, वर्धा २) आचार्य विनोबा भावे (चरित्र) – डॉ. पराग चोळकर, माजी संपादक – परंधाम प्रकाशन, पवनार आश्रम, वर्धा

सुबोध केंभावी -- इंदिरा गांधींनी आणीबाणी व अनुशासनपर्व जाहीर करून देशाची एकात्मकता जपली आणि सार्वभौमत्व राखले. पण, याच आणीबाणीच्या काळात नोकरशाही आणि पोलीस यांचे अतिरेक वाढले. अनेक कार्यकत्र्याना तुरुंगात डांबले गेले. मीडियावर सेन्सॉरशिप लादली गेली आणि एक प्रकारची एकाधिकारशाही आली. 1977 च्या निवडणुकीत लोकांनी त्या एकाधिकारशाहीचा पराभव केला. -कुमार केतकर आणीबाणी स्मरणातली आणि विस्मरणातली! लोकमत, २१ जून २०१५ http://www.lokmat.com/manthan/emergency-remembered-and-forgotten/ राजेंद्र कडू -- देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्यावरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या पत्रकार, विचारवंत, लेखकांच्या हत्या केल्या जात आहेत. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. बेरोजगारीत बेसुमार वाढ होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलणा यांना देशद्रोही ठरवले जात आहे. कोणी काय खायचे, कोणते कपडे घालायचे यावर नियंत्रणे आणली जात आहेत, ही अघोषित आणीबाणीच.

८) आणीबाणी ही आत्मवंचना होती- केतकर कबुली?

प्रबोध ढवळे --  खूपच छान विश्लेषणात्मक लेख आहे. जसे आज काही लोकांना मोदीभक्त संबोधले जाते तसेच त्या काळी इंदिरा भक्त पण होते. पण लेखात नमूद केलेल्या दूसऱ्या इंदिरानी अशा भक्तांना दूर सारले म्हणून अधोगती झाली.

९) आणीबाणी अपरीहार्य का झाली ?

देवेंद्र राक्षे  -- विद्वत्तेचा गैरवापर आणि वकिली पांडित्य या खेरीज भाटगिरी हा शब्द वापरल्यास केतकर रागावतील नक्कीच, सध्या लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस यांनी चिदम्बरम यांची विकतची पत्रकारिता ज्या प्रमाणे चालवली आहे त्याप्रमाणेच आहे हे याशिवाय अधिक लिहिणे म्हणजे या पत्रकाराचे स्तोम माजवणे होईल मुकुंद जी -- हुशार माणसाची बुद्धी वाकडी चालायला लागली कि असे लिखाण होते. इंदिरा गांधी काही धुतल्या तांदळा सारख्या स्वच्छ नव्हत्या जर्मन पाणबुड्या, सुकोय विमाने, विक्रांत या सर्व अव्वा च्या सव्वा भावाला खरेदी केल्या होत्या. आपण JERICHO FILES नावाची कादंबरी वाचा. त्यात रशिया आपला हेर इस्रायेल मध्ये पंतप्रधान करतो तीच परिस्थिती होती. आणि आजही आहे. रशिया च्या पाठीम्ब्यामुळे त्यांना आणीबाणी आणायची हिम्मत झाली.

१० ) ठणठणपाळचा हातोडा आणि आणीबाणी

संजय मुळ्ये -- आतापर्यंत आलेल्या सर्व लेखांपेक्षा अधिक उजवे लेख…जयवंत दळवींचे भाषेवरील अफाट प्रभुत्व आणि sense of humour लाजवाब……जुन्या पिढीसाठी अप्रतिम वाचनानंद…. शशिकांत कुलकर्णी -- फारच सुंदर आणि मजेदार लेख ! आजची इंग्लिश मेडियमची मुलेही हा लेख वाचून मराठीच्या प्रेमात पडतील ! त्या काळात आम्ही ललित मासिकाचे वार्षिक वर्गणीदार होतो ! हे आणि इतर लेख सुद्धा तेंव्हाही खुप आवडले होते ! आज नव्याने आनंद झाला देवेंद्र राक्षे -- हे लेख सशुल्क आहेत, पण त्याचा व्यवहार कसा मांडणार, म्हणजे १०० लेख वेगवेगळे की एक लेख १०० वेळा असे पण हिशेब लावणार ते आधीच सांगा, कारण हा लेख १००० वेळा वाचला तरी समाधान म्हणून होणार नाही. निदान हा लेख सशुल्क यादीतून काढावा, एखाद्या निराश समयी वा थकलेल्या मनास उभारी आणणारे हे लेख पुनः पुन्हा वाचल्यास व ते वाचता आल्यास वाचकास उभारी मिळेल. अतिशय ओघवती भाषा, बारीकसारीक तपशिलांनी भरलेले एवंगुणस्वभाव वैशिष्ट्यांनी नटलेले ठंणठणपाळाचे हे लेख म्हणजे मराठी साहित्यातील न आटणारा ठेवाच आहे. आणिबाणीचे दशक म्हणजे ठंणठणपाळाचे उमेदीचे दिन. ठंणठणपाळाने आसपासच्या कुणाला सोडले असेल हा पण एक अभ्यासाचा विषय ठरावा. ठंणठणपाळाचे लेख यंत्रणेला समजले नाहीत असे म्हणणे भोळसटपणाचे ठरेल, पण तरीसुद्धा ते यंत्रणेच्या धाकातून सुटले हा केवळ चमत्काराचाच विषय ठरतो हे खरे. इंग्रजी साहित्यात पी जी वुडहाऊस चे जे स्थान ते मराठी सारस्वतात ठंणठणपाळाने कमविले. चिमणराव संचार करताना प्रसंगनिष्ठ व्यवहारांवर भाष्य करतो, तर ठंणठणपाळ केवळ मराठी सारस्वतातील बारा भानगडींचा व्यात्यास शाब्दिक फुलोऱ्यांनी विनोदाचे कारंजे उडवित असे काही खुलवितो की वाचक मंद हास्य ते गडबडा लोळणे यात रममाण होतो. ठंणठणपाळ म्हणजे विनोदाचे कारंजे, विनोदी प्रहसन, मद्र सप्तकातील विनोदाचे खुमासदार मंथन. मेरूपर्वताच्या घुसळणीतून निघालेले हे एक प्रकारचे चौदावे रत्नच म्हणावे की याच्या असुडाचा फटका गुदगुल्या करीत लोळवतो नि अक्षरशः छळतो. या लेखमालेची सांगता ठंणठणपाळाने होणे म्हणजेच साठाउत्तराची आणीबाणी पाचा उत्तरी (विफळ) (संपन्न नव्हे पण) समाप्त. आशिष चासकर -- “त्यावेळी तुम्ही कुठे होता?” हे 1977 पासून आहे तर…

११) आणीबाणी म्हणजे काय रे भाऊ?

प्रमोद सबनीस -- फारच मुद्देसुद विवेचन वसंत देशपांडे -- आणीबाणीचा विषय वेगवेगळ्या प्रकारे सादर करण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे. मला सगळे लेख वाचायला मिळाले नाहीत, कारण आपण केलेली वाचकांची वर्गवारी आणि सामान्यांबरोबर राहण्याचा माझा हट्ट. असो. मी कोणत्याही पक्षाशी बांधून घेण्याच्याविरुद्ध आहे कारण एकदा ते स्वीकारले की रमेश पतंगे म्हणतात ते ”विचार स्वातंत्र्य” पक्षविचारसरणीकडे गहाण ठेवावे लागते. त्याचा मला तिटकारा आहे. त्यामुळे अनेकवेळा ”ना घरका ना घाटका” अशी अवस्था होते. ती मी स्वखुशीने स्वीकारली आहे. हे सांगण्याचे कारण पुढे मी जे काही मांडले आहे ते योग्य संदर्भात घेतले तर विचारी वाचकांना आवडेल अशी माझी धारणा आहे. श्री. रमेश पतंगे हे विशिष्ट विचारसरणीशी बांधलेले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत हे त्यांनी लिहिलेले जे काही थोडेफार वाचले आहे त्यावरून माझे मत झाले आहे. त्यामुळे त्यांचे हे लेखनही समर्थनार्थ आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याबद्दल काही न लिहिता मूळ विषयाकडे यावे असे वाटते. मूळ विषय ”आणीबाणी हा आहे आणि ती पुकारणे अथवा अनुभवणे” हा आहे . ज्याच्या हाती सत्ता असते तो/ती आणीबाणी पुकारतो/ते आणि आमच्यासारखे सामान्य नागरिक ती अनुभवतात. तिच्याबद्दल उघडअथवा गुप्तरित्या निषेध व्यक्त करतात. कारण राज्यव्यवहारानुसार सत्ताधिशाला त्यांनी तसे अधिकार दिलेले असतात. एकदा अधिकार हाती आले की ते आपल्या ”आतल्या आवाजा”नुसार सत्ता राबवायला सुरुवात करतात. त्यांच्याभोवती तोपर्यंत पुरेसे तोंडपुजे जमा झालेले असतात आणि मग बारुआप्रमाणे त्यांना ”राजा(पुढारी) चूक असूच शकत नाही”, असे वाटू लागते ते उघडपणे तसे म्हणू लागतात. त्यात आपला सूर मिसळला नाही तर पुढा-याच्या मर्जीतून अपण उतरू या भीतीने इतर तोंडपूजेही तेच करू लागतात. आधीच स्वतःबद्दल अवास्तव ग्रह करून घेतलेल्या पुढा-याला त्यात सुरक्षितता वाटते आणि त्याची घसरण जोरात सुरू होते. विषय राजकीय आणीबाणीचा असला तरी सर्वच सामाजिक संस्थांत त्याचे प्रत्यंतर येते. संदर्भ राजकीय असल्याने आपण आपल्या देशातल्या राजकीय पक्षांकडे वळलो तर काय आढळते? सर्वच पक्षातले पुढारी याच स्वभावाचे आहेत. ते स्वतः आपापल्या पक्षात याच मनोवृत्तीचे पोषण करतात. याची स्पष्ट लक्षणे दोन आहेत. एक विरोधी मते डावलून तोंडपुजे गोळा करायचे आणि दोन आपले जैविक वारस गादीवर बसवायचे. हे जोपर्यंत बदलत नाही तो पर्यंत ख-या अर्थाने लोकशाही आपल्या देशात येणार नाही, रुजणार नाही. तो पर्यंत सर्वच पुढा-यांचा आपण लोकशाही वृत्तीचे आहोत आणि दुसरे हुकूमशाही वृत्तीचे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न चालू राहणार आणि त्यांच्यातील जो चलाख असेल तो/ती यात यशस्वी होणार. तो निदान पाच वर्षे आपणावर राज्य करीत राहणार. कारणआपण स्वतःच्या मनात डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की अजूनही आपल्या मनातलीसुद्धा सरंजामशाही संपलेली नाही. वर्षा गोखले -- एकदम बरोबर! तुलसीदास -- Sadhya pun aghoshit anibani chalu ahe he nischit. Lekhak kunachi baju mandato ahe te lagech dhyanat yet. Mi Vasant Deshapande she sahamat she.    


आणीबाणी

प्रतिक्रिया

  1. drvyankatesh

      6 वर्षांपूर्वी

    फारच चान्गला वाटला



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen